मुक्काम मेडशी

अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे माझी नियुक्ति मेडशी शाळेवर करणेत आली . त्याप्रमाणे मी मेडशी शाळेत रूजू झालो . तेथे मी सर्वात तरूण , अविवाहीत आणी सर्वात जास्त ( कॉलेज ) शिकलेला होतो . येथे मुख्याध्यापक , श्री. हाते गुरूजी , सर्वश्री . शिनगारे , पाठक , आझम , कांबळे ,
चिमणकर , गोसावी , काळे , भुस्कुटे , भोळे ,तसेच श्रीमती पाठक ,दिक्षीत ग…इ.खूपअनुुभवी शिक्षक वर्ग होता . मेडशी येथे प्राथमिक शाळेच्या समोर रोडच्या बाजुला श्री नागनाथ हायस्कुल ,जि. प. प्राथमिक कन्या शाळा हेोती . मेडशी शाळेची स्थापना १८६९ साली

वत्सगुल्म (आताचे वाशीम ) जिल्हा असतांना झाली होती .मेडशी शाळा पूर्वी शासकीय मुलोद्योग शाळा ह्या नांवाने होती . १९६२ पूर्वी अकोला जिल्ह्यात अशा सहा शाळा होत्या . तेथे कापसाच्या पेळूपासून टकळीवर सूत कातणे ,कापड तयार करणेच्या सगळ्या प्रक्रीया शिकविल्या जात.मेडशी येथे 1964 साली श्री . विनोबा भावे आले त्यावेळी त्यांचे स्वागत फुलांच्या हाराऐवजी सुताचा हार घालून करण्यात आले होते .अकोला जिल्हा परिषदेची १९६२ साली स्थापना झाली . त्यानंतर ह्या सर्व शासकीय शाळा जिल्हा परिषदेत विलीन करणेत आल्या . त्यावेळी सर्व कर्मचारी शासकीय सेवेतून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले . शासकीय मुलोद्योग शाळेचे नांवआता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,असे करणेत आले .
मेडशी येथे प्राथमिक शाळा सातव्या वर्गापर्यत होती . मेडशीचे दानशूर गांवकरी श्री. बाबुरावजी घुगे ह्यांनी प्राथमिक शाळेला लगतची शेत जमीन दान दिली होती. श्री . हाते गुरूजी पंचक्रोशीत अतिशय लोकप्रिय होते .
आपल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकवर्ग तसेच इतर सर्व वर्ग ४ च्या कर्मचार्यांनाही
आदरार्थी बोलण्या वागण्याची सवय त्यांनी सर्वांना लावली होती . त्यांनी पंचक्रोशीतील गांवकर्यांकडून लोकवर्गणी जमा करून मेडशीला हायस्कूल सुरू केले . मेडशी हायस्कुलचे नांव ग्रामदैवत श्री नागनाथ (शंकराचे एक नांव ) हायस्कुल असे सर्वानुमते ठेवण्यात आले . हायस्कुलचा कर्मचारी वर्ग , प्राथमिक शाळा , तसेच कन्या शाळेचा कर्मचारी वर्ग , पोलीस कर्मचारी , गांवातील इतर शासकीय कर्मचारी ……इ . कोणत्याही सभारंभात जणू एकाच संस्थेचे कर्मचारी असल्यासारखे , आपुलकीने एकत्र येऊन कामे करीत .गांवातील कोणत्याही सामाजीक कार्यातही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे विलक्षण कसब श्री . हाते गुरूजींकडे होते . त्यांचे नांवाची शिफारस जिल्हा परिषदेने ” आदर्श ” शिक्षकांसाठी केलेली होती . प्रत्येक दसरा ,दिवाळी व इतर महत्वाच्या दिवशी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ति सर्व कर्मचार्यांना त्यांच्या घरी आदराने बोलावीत .श्री .हाते गुरूजी हायस्कुलच्या ,आमच्या वा कोणत्याही कर्मचार्यांना आदरार्थि’च बोलत . माझे वडीलही आमच्या शाळेत चपराशी (attendant grade l)होते.

मला मेडशी शाळेत नियुक्ती मिळाली नी माझ्या जीवनाला ,अगदी वेगळे वळण मिळाले . श्री .हाते गुरूजींनी माझेवर वर्ग ५_६ _७ च्या ‘अ ‘ आणी ‘ ब ‘ डिव्हीजनपैकी ‘ ब ‘ डिव्हीजनला इंग्रजी , गणित , सायंन्स हे विषय शिकवायची जबाबदारी माझेवर सोपविली . ह्याशिवाय शाळेचा पी. टी . आय . , स्काऊट टिचर , शाळेचा बँड , शाळेला लागूनच असलेले भाजी- शेतीचे वाफे , शाळेचे हिशेब , स्कॉलरशिपचे वर्ग ….इ.चीही जबाबदारी माझेवर सोपविली होती .

मला हे सगळे नवीनच होते . कोणतीही जबाबदारी प्रसन्नतेने पार पाडायची हे मी ठरविले . त्यासाठी मी माझ्या पध्दतिने नियोजन करण्याचे ठरविले . प्रथम वर्ग ७ साठी सकाळीच दोन जादा तास घेणे सुरू केले . रात्री प्रत्येक वार्डात एक एक गटप्रमुख नेमुन गटागटाने एकत्रित अभ्यास करण्याची सवय लावली . वर्ग ४ तसेच वर्ग ७ च्या विद्यार्थ्यासाठी दररोज सकाळीच ग्रामपंचायत कार्यालयात वीजेच्या दिव्यात विषेश वर्ग सुरू केले . १९६८ – ६९ साली वर्ग ४ च्या प्राथमिक शिष्यवृति परिक्षेत अकोला जिल्ह्यातून पहिल्या तीन क्रमांकात मेडशी शाळेचे दोन विद्यार्थी होते .

शाळेचा पी . टी . आय . म्हणून सर्वप्रथम प्रार्थनेसाठी प्रत्येक वर्गासाठी शाळेच्या प्रांगणात एका आडव्या रांगेत वर्गप्रमुखासाठी प्रत्येकी एक वीट जमिनीत पक्की केली . सकाळी प्रार्थनेच्या वेळी वर्ग -प्रमुखामागे वर्ग-शिक्षक व समोर त्या त्या वर्गाची मुले , मुली रांगेत उभ्या ऱाहत . एक प्रकारची वेगळी शिस्त शाळेतील विद्यार्थ्यांना लागली .आमच्या मुख्याध्यापकांना , सर्व शिक्षकांना तसेच गांवकर्यांना हा बदल खूप खूप भावला .

स्काउट शिक्षक प्रशिक्षण कापशी (तलाव) , अकोलासाठी माझी निवड झाली . सदर प्रशिक्षण दिनांक १० मार्च १९६९ ते २१ मार्च १९६९ ह्या कालावधीत होते . श्री . मु . ना .कुळकर्णी , जिल्हा स्काऊट प्रमुख , हे शिबीर प्रमुख होते . त्यांचे सोबत .श्री .ए . आर . खान जिल्हा सेक्रटेरी (स्काऊट )तसेच श्री . धाबलीया , स्काऊट प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले . प्रशिक्षणाच्या काळांत गुढी पाडवा सण सर्वांनी आनंदाने व मौजमजेत साजरा केला .सर्वांना विषेशत: नवनवीन मित्रांना कैरीचे पन्हे खूपच आवडले .

मेडशी सर्कलचे खेळ मेडशीलाच खेळविले जात असत . पंचायत समिती स्तरावरील सामने मालेगांवला झाल्यावर जिल्हा ऑलिंपीकसाठी अकोल्याला जावे लागायचे .मेडशी शाळेचे खेळाडू कुस्ती , खो खो , हॉलीबॉल ,हुतूतू ……इ. खेळांत जिल्हा ऑलींपिक मध्ये असायचे . चंदू गवळी , तसेच उदालाल हे दोन्ही खेळाडू कुस्तीमध्ये आणि खो खो चमू जिल्हा पदके दरवर्षी जिंकून आणत .

मोर्णा नदीच्या काठावर जंगलात ( डागेत ) ग्रामदैवत श्री .नागनाथाचे (महादेवाचे) मंदीर होते . महाशिवरात्रीचिया दिवशी तेथे जत्रा भरविली जायची . तसेच अकोला वाशीम रोडवर आमराईजवळ खंडोबाचे देऊळ होते . खंडोबाची जत्रा रथ सप्तमीच्या अगोदर अमावस्येला भरविली जायची . आजुबाजूच्या खेड्यातील लोक अतिशय उत्साहाने भाग घेत .

रथसप्तमीला मालेगांवजवळच्या डव्हा येथील श्री . नाथ नंगे महाराजांची मोठ्ठी यात्रा ७ दिवस (आठवडाभर) असायची . तेथे श्री . नाथ नंगे महाराजांचे शिष्य , श्री . विश्वनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच श्री . पंडीत बाबा , गांवोगांवच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जवळजवळ चार महिने अगोदरपासून तयारी सुरू करायचे , प्रसादाच्या पुर्या , बुंदी , पत्रावळी अंदाजे चार ते पाच लाख लोकांना पुरतील इतक्या मोठया प्रमाणात तयार करून कोठिघरात साठवायचे काम सुरू असायचे . दरवर्षी पुरूष , महिला स्वेच्छेने व एकोप्याने ही कामे वाटून घेऊन झपाटल्यासारखे पूर्ण करीत असत.

जानेवारीमध्ये शेतीतील पिके नुकतीच काढून झालेली असतात. ह्याचा फायदा
घेऊन श्री. विश्वनाथ महाराजांनी श्री . नाथ नंगेमहाराजांच्या रथ सप्तमीच्या दरवर्षीच्या आठवडाभराच्या यात्रेची आखणी केलेली होती .यात्रा समितीने एकमताने त्याला संमती दिली होती .

मंदीराभोवतीच्या जवळजवळ १५ एकर शेतीत ट्रँक्टरने प्रत्येक ३० फुटावर सरळ लाईन्स नांगरल्या जात . महाप्रसादाच्या दिवशी सकाळपासूनच यात्रेला आडलेले लोक , प्रत्येक लाईनच्या दोन्ही बाजूस पाठीला पाठ लाऊन नंबर लाऊन बसत . प्रत्येक दोन लाईन्स मधून एकामागे एक अनुक्रमे पत्रावळी , पुरी , बुंदी घेतले ट्रक्स चालविले जात . ट्रकच्या दोन्ही बाजूला बसलेल्या लोकांना प्रसाद म्हणून प्रत्येकी ४ पुर्या आणि ओंजळभरून बुंदी प्रत्येकाला दिल्या जाई . त्याअगोदर श्री . विश्वनाथ महाराज स्वत: कोठीघरांत जाऊन अन्नपूर्णा देवीला पाणी फिरऊन नैवेद्य दाखवित . रांगेतील शेवटच्या व्यक्तिला प्रसाद मिळाल्याची खातरजमा
झाल्यावर उंच उभारलेल्या स्टेजवरून श्री . विश्वनाथ महाराज आणी इतर उपस्थित संत मंडळींकडून ” पुंडलीक वरदा हरि विठ्ठलाचा ” गजर झाल्यावरच सगळ्या जनताजनार्दनाला प्रसाद ग्रहण करण्याची तेथे प्रथा आहे . तळाशी नागाची समाधी त्यावर श्री .नाथ नंगे महाराजांची समाधी , त्यावर शंकराचे मंदिर ,सर्वात वर देवीचे दर्शन घेऊन बाजूलाच बिनखांबी मंदिरात ब्रम्हदेवाचे दर्शन घेऊन, विविध ठिकाणी जाऊन यात्रेची मौजमजा लुटायचेा . तमाशाचे फड ,तंबुची चित्रपटगृहे , मौतका कुवा . भांड्याची दुुकाने , प्रसाद ,रेवड्या , डाळ्या , कपडे ,
खेळण्यांची दुकाने …….इ .ना भेटी देऊन त्याचीही मजा घ्यायची बालगोपाळांना तर फार मेाठी सुसंधी असायची .अशा यात्रेत नवीन खेळणी , कपडे ,खाऊ ….इ मिळाल्याने बच्चे मंडळी आनंदून जातात .तरूण -तरूणींची लग्ने जुळतात ,तुटलेली नाती पुन: भेटल्याने जुळतात .

आम्ही शिक्षक मंडळी मेडशीहून १० मैलाचा रस्ता जवळच्या पाऊलवाटेने ब्राम्हणवाडा , राजुरा ,सुकांडा ,कुरळा ह्यी गावातून तेथील मित्रमंडळींना भेटून , चहापाणी , नाश्ता ,घेत घेत मजल दर मजल करीत डव्हा येथे पोहोचायचो . महाप्रसाद घेऊन रात्रभर यात्रेत तमाशा , चित्रपट ,…….इ चा आस्वाद घेतल्यावर दुसर्या दिवशी रात्री घरी परत यायचो . मेडशी येथील वयोवृद्ध शिक्षक श्री . शिनगारे सेवा निवृत्तीनंतर डव्हा येथे संस्थानातच राहत होते . त्यांची तेथे गेल्यावर भेट होत असे . त्यांच्यावर श्री विश्वनाथ महाराजांची विषेश कृपा होती . त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन जऊळका येेथील पोलीसाशी लाऊन दिले होते .
श्री क्षेत्र डव्हा येथे गांवापासून ४ मैलावर काटेपूर्णा नदी पूर्ववाहीनी असल्याने पवित्र क्षेत्र झाले आहे . त्यालाच ” चाsकs ” असेही म्हणतात . नदीकाठावरच श्री विश्वनाथ बाबांचे निवासस्थान ‘ झेापडी ‘ आहे . तेथे श्री विश्वनाथ बाबांची रेड्याच्या समाधीजवळ बसल्यावर , जेंव्हा समाधी लागायची , तेंव्हा त्याच्या तोंडून निघालेल्या ओव्या आम्ही ४-५ जण लेखणीने उतरऊन घ्यायचो , अशाच ओव्यांचीच पुढे पोथी तयार झाली .
मेडशी सर्कल , मालेगांव झोन , तसेच अकोला जिल्हा ऑलींपिकच्याही खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या . २६ जानेवारीला बक्षीस समारंभ पार पडला .
गांवची जत्रा झाली , श्री नाथ नंगे महाराजांची आठवडाभर चाललेली यात्राही संपली अन् मग पुन: शाळेची लगबग सुरू झाली . वर्ग ४ व ७ च्या मुलांसाठीची अनुक्रमे प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे वर्ग जोरात सुरू झाले . मुले ,मुली ईलेक्ट्रीक लाईट असलेल्या ग्राम पंचायत कार्यालयात पहाटेच ५ वाजता दोन तास जादा वर्गासाठी येत असत .
पुन्हा घरी जाऊन सकाळी सात वाजता वर्ग ७ ची मुले नऊ वाजता गणिताच्या व सायन्सच्या जादा वर्गासाठी शाळेत हजर असत . पंचायत समिती स्तरावरील भारत स्काऊट आणि गाईडचा जऊळका येथे कँप घ्यायचे ठरले . गाईड टिचर श्रीमती मंगला पाठकबाई व स्काऊट टिचर म्हणून मी होतोच .१५ स्काऊटची मुले व १५ गाईडच्या मुली घेऊन आम्ही सर्वजण जऊळका येथे वेळेवर जाऊन पोहोचलो . त्यात श्री. भागवत , सिनिअर ग्रामसेवक श्री. भागवतांची २ मुले व १ मुलगी यांचा विषेश सहभाग होता . कँपच्या मैदानात एकमेकांच्या मदतीने तंबु तयार केला . दररोजच्या स्वयंपाकात , फायर कँप (शेकोटी ) , नकला , गाणी ह्या सगळ्या कार्यरक्रमात सहभागी होत असत . स्काऊट व गाईडचा आठवडाभराचा कँपच्या कालावधीत खेळीमेळीने सगळे कार्यक्रम पार पडले . समारोपाच्या दिवशी मेडशी शाळेकडून , लग्नाची वरात मुला-मुलींनी मिळून झोकात पार पाडली . गाईड शिक्षिका श्रीमती पाठकबाई नवरी झाल्या होत्या .मेडशी शाळेच्या स्काऊट गाईड चमुने द्वितीय पारितोषिकही मिळविले . कँपहून परत आल्यावर मेडशी शाळेच्या मुला – मुलींना घेऊन मी कधी कधी गावाबाहेरच्या मोर्णा नदीच्या काठावरील डाक बंगला , चोंढी – धरण ,नागनाथ मंदिराजवळील जंगलात ट्रेकींगला घेऊन जात असे .
वर्ग ४ व ७ च्या स्कॉलरशीपच्या परिक्षा आटोपल्या . १९६८-६९ सालच्या प्रथमच झालेल्या ह्या परिक्षेत मेडशी शाळेचा जिल्हयात खूप चांगला निकाल लागला . पुर्व-प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत अकोला जिल्हयात पहिल्या तीन विद्यार्थ्यापैकी पहिले दोन विद्यार्थी मेडशी शाळेचेच होते . त्यांना शाळेतच नव्हे तर पुढे कॉलेजमधील पदवी परिक्षेनंतरही उच्च शिक्षणासाठीही दरवर्षी वाढत जाणारी शिष्यवृत्ती मिळणार होती . वर्ग ४ व ७ च्या इतरही ८-१० विद्यार्थ्यांना ३- ३ वर्षे शिष्यवृत्ती मिळणार होती .
मेडशीचा आठवडी बाजार दर शुक्रवारी असायचा .त्यादिवशी सर्व शाळा सकाळीच ११ वाजेपर्यंतच असायच्या .त्यानंतर सर्व शिक्षक- शिक्षिकांची वादविवाद स्पर्धा असायची . दर आठवड्याचे विषय वेगवेगळे असायचे .उदाहरणार्थ गणपती , हरीतालीका , मंगळागौर , दिवाळी , होळी …..इत्यादी भारतीय सण केव्हा ? का ? कसे ? तसेच का ? ……..इत्यादी मुद्यांवर सर्वांनी आपापली मते मांडायची , त्यावर चर्चा करायची , जणू आम्हा सर्वाना त्याची सवयच लागली होती .
गणपती त्याची विविध रूपे , त्याला दुर्वाच वा विशिष्ट वनस्पतीच का वाहायच्या ? गणपती म्हणजे काय ? गणपती अथर्व शिर्षमध्ये हयाचे उत्तर दिलेले आहे .’ गणांनां त्वं गणपती ! ‘ गण ‘ म्हणजे समुदाय त्याचा मुख्य तेेा गणपती ! हा गणपतीचा पहिला अर्थ .गणपतीला हत्तीचे मस्तक लावलेले आहे , त्याचे सुपा सारखे कान ,लांब सोंड का ? एकदंत का म्हणतात ? तुंदील – तनु का म्हणतात ,गणपतीचे वाहन उंदिरच का ? पुरातन काळापासून आपल्याला आपल्या पूर्वजांनी गणपतीच्या जन्माबाबत कोणकोणत्या कथा सांगितल्या ,अष्टविनायक -गणपती कोठेकोठे आहेत ?अष्टविनायक यात्रेचा योग-संधी आल्यास त्याचा अवश्य लाभ घ्या ! आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात अष्टविनायकाशिवाय इतर ठिकाणच्या गणपती मंदिरांची माहिती , त्यांच्या कथा-गोष्टी यांची आणखी माहिती मिळऊन पुढील आठवडयांमध्ये क्रमाक्रमाने सांगण्याचे आवाहन श्री . हाते गुरूजींनी सगळ्यांना केले .
घरातील सुनबाईने हरितालीकाचे व्रत का ? कसे ? केव्हा ? ते त्याच कालावधीत (श्रावण महिन्यातच ) का साजरे करायचे ? हरितालीकेची पूजा पाटा वरवंटयावरच का मांडायची .आजुबाजूच्या वनस्पतीची ३२ -३२ पाने , फळे, फुलेच ….का जमा करून आणायची , घरची सासू त्याबाबत काय काय मार्गदर्शन करते ? आजुबाजूच्या पंचक्रोशीतील वनस्पती पाने , फुले ,फळे यांचा लहान मुलांना होणारा औषधी उपयोगाची माहिती देते की नाही ? ….इ चा उहापोह सविस्तर पद्धतिने व्हायचा .हरितालीका व्रत नववधुने पहिली पाचवर्षेच का करावे ? कारण त्यावेळी ह्या काळातच नवपरिणीत वधुला नवीन बाळ झाले की ,पंचक्रोशीत वैदय ,डॉक्टर उपलब्ध नसल्याने आजीबाईच्या बटव्यातील औषधासोबतच आजुबाजुच्या वनस्पतीची ओळख ,त्याचे औषधी गुणधर्म , बाळगुटी , केव्हा केव्हा ,कधीकधी द्यायची ह्याची माहिती होत असे . तसेच गुढीपाडवा ते होळीपर्यंतचे भारतीय सण , व्रत – वैकल्ये कालमानानुसार कशी आचरायची ह्याची माहिती घरातील सासुबाई , आजीबाईकडून नववधूला प्राप्त होत असे.पाटयावर वनस्पतीची पाने वरवंटंयान वाटता येतात . कपड्यात लगदा घेऊन रस पाहिजे तेव्हा गाळून घेता येतो .हयाशिवाय वेगवेगळ्या वनस्पतींचा औषधी उपयोगाची माहिती मिळविण्यास सांगितले .
उदाहरणार्थ : –
( १ )जास्वंदीची पाने , फुले खोबरेल तेलात उकळऊन जास्वंद तेल तयार करता येते .
( २ )पेरूच्या झाडाची कोवळी कोवळी पाने चाऊन तयार झालेली गोळी दाताखाली , दाढेखाली ठेवल्यास दातदुखी ,दाढदुखी लगेच थांबते .
(३ )आपल्या विभागातच नव्हे तर सर्वत्र निर्गुडीची झुडपे आढळतात .त्यापासून आपल्या गावातील श्री .बाबू कैकाडी वेगळ्या आकाराच्या कणग्या बनवितो ह्यामुळे त्याच्या कुुटुंबियांना वर्षभर रोजगार – हमी सारखे काम मिळालेले आहे .
(४ ) निरगुडीच्या पानापासून वातरोगावर अत्यंत उपयोगी असे निर्गुडीचे – तेल मिळते .
(५ ) निरगुडीची पाने पोत्यावर ठेऊन त्यांवर बांधकामासाठी वापरकरतात ती वीट चुलीतील आगीत गरम करून त्याने पाय , हात , पाठ ….इ .ला शेक दिल्यास तेथील वातरोग आटोक्यात ठेवता येतो .
हया माहितीमुळे गावाबाहेर राहणारा अडाणी /अशिक्षित /उपेक्षित अशा कैकाड्याकडून पिढीजात औषधीची अधिक माहिती मिळविण्यासाठी , सगळ्यांनी त्याच शुक्रवारी आठवडी बाजारात श्री . बाबु कैकाड्याच्या झोपडीला भेट दिली . सतत समाजोपयोगी पडणार्या कैकाड्याची हलाखीची आर्थिक परिस्थिती आमच्या लक्षात आली .त्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा आम्हा सगळ्यांचा द्दष्टिकोनच बदलला .

माझेकडे शाळेचे हिशेब , पत्रव्यवहार , शेती-भाजीचे वाफे ,स्काऊट , बँड ,खेळ ,शिष्यवृत्ती परिक्षा ,वर्ग ७ चे ईंग्रजी, गणित ,सायन्स , पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेशी संबंधीत कामाची जबाबदारी मुख्याध्यापक श्री .हाते गुरूजींनी सोपविली होती . ह्याव्यतिरिक्त मी बी . एस . सी .पार्ट १ ची नागपूर विद्यापिठाची बही:शाल परिक्षाही देण्याचे’ठरविले . तसेच सिनिअर पी . टी .सी .ची परिक्षाही दिली . मी नॉर्मल स्कुलमध्ये ट्रेनिंगला असतांनाही परिक्षेला बसलो होतो .त्यावेळीB.S. C part I चा Practical Inorganic/organic सह
एक विषय केमेस्ट्री राहीला होता . त्यावेळी मला केमेस्ट्रीच्या पहिल्या पेपरमध्ये ५० पैकी २७ मार्क मिळाले होते ,तर दुसर्या पेपरमध्ये ५० पैकी फक्त ३ च मार्क मिळाले होते .
नागपूर विद्यापीठाकडे मी फेरतपासणीसाठी अर्ज केला पण काहिही उपयोग झाला नाही .
मी मुख्याध्यापकांची परवानगी व जरूरीपुरती रजा घेऊनपरिक्षेसाठी अकोल्याला गेलो . परंतू एक पेपर फुटल्यामुळे मला तेथेच थांबावे लागले . परिक्षा झाल्यावर मी परत मेडशीला शाळेत हजर झालो . दरम्यानच्या काळात माझ्या वडिलांची प्रकृति ठिक नसल्याने अर्जित रजेवर (earned leave )होते परंतू आपण उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी उपभोगत असल्याने (vacation department ) अर्जित रजेस पात्र नाही . सबब आपणास अर्धपगारी रजाा मंजूर करण्यात येत असल्याचे कळविले होते .पगाराच्या दिवशी आम्हा दोघांनाही हे सगळे कळले . आता दोघांमिळून अर्धाच पगार हातात आला . आता मात्र मी खूपच निऱाश झालेा होतो .शेवटी सर्व मिळून ह्या महिन्यात मिळू शकणारी भि .सी.आम्हाला दिली .त्यापैशामिळून त्या महिन्याचा खर्च भागवला .पगाराच्या अगोदर १० दिवस पंचायत समितीकडून तसे पत्राने शाळेला कळविणेत आले होते .
मी ताबडतोब पंचायत समितीत जाऊन शिक्षण लिपिकाला भेटलो . त्यांनी अर्धपगारी रजेचा घेतलेला निर्णय B .C .S R . नियमाप्रमाणे योग्यच असल्याचे सांगितले .मला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जाण्याचा पर्याय खुला होता .त्याप्रमाणे मी प्रकरणी ति . रा . रा .बाबांना अर्ज करण्यास सांगितले .प्रकरणाचा पाठपुरावा सुरू झाला . जवळ जवळ एक वर्षानंतर शिक्षणाधिकार्यांनी ति.बाबा दिवाळीची आणी उन्हाळ्याची सुटी उपभोगतात की शाळेत उपस्थित असतात हयाची तपासणी करणयाचे आदेश काढले . त्यासाठी त्यांच्या नेमणुकीपासूनचे १९५५ पासूनचे हजेरी पट काढून तपासले . तेव्हा तेथे ति . बाबांनी उन्हाळ्याच्या /दिवाळीच्या दिवसातही सुटी न उपभेगता दररोजच्या स्वाक्षर्या केल्याचे नजरेस आले . ह्याचाच अर्थ ति . बाबा Vacation Department प्रमाणे दिवाळी आणी उन्हाळ्याची सुटी उपभोगत नाहीत . त्यामुळे त्यांची रजा अर्धपगारी करण्याचा पंचायत समिती मालेगाव ,शिक्षण विभागाचा आदेश रद्द् करून श्री .वामनराव बळीराम लोणकरांना ,अर्जित रजा
मंजूर करणेचे आदेश काढावेत असे निर्देश जि. प . शिक्षण विभागाने दिले .ह्या सर्व प्रकरणांत अकोला जि . प . शिक्षण विभागातील सुपरिंटेंडेंट श्री .कारखानीस साहेबांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले . मालेगांव पंचायत समिती शिक्षण विभागाने अर्जित रजा मंजुरीचे आदेश काढून पगाराची थकबाकीही दिली .शेवटी सत्याचाच विजय झाला ,न्याय मिळाला .
श्री . वा .शं . हाते ,गुरूजींना राज्य शासनाचा ‘आदर्श प्राथमिक शिक्षक ‘ पुरस्कार जाहिर झाला . मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला .मेडशीला परत आल्यानंतर स्टँडवर त्यांचे स्वागत करण्यामत आले . पाच सुवासिनींनी ओवाळल्यावर त्यांची गावाच्या मुख्य रस्त्यावरून ढोल ,लेझीम ,बिगुल वाजवत , स्काऊट -गाईडसह भव्य मिरवणूक काढणेत आली .गावातील चौकाचौकात गावकर्यांनी त्यांचे स्वागत केले . शाळेत आल्यावर त्यांच्या गौरवपर भाषणे झाली . श्री . हाते गुरूजींनी त्यांच्या मुंबई पुरस्कार सोहळ्यातील त्यांचे अनुभव सांगीतले .

पुढील वर्षी १९६९ – ७० मध्ये मेडशी शाळेची स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्धी वर्ष साजरे करायचे होते .त्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करून त्याचे नियोजन करणेत आले . कार्यक्रमाची गटवार विभागणी करून तालमी सुरू झाल्या . मुख्य पाहुणे म्हणून माननीय रामरावजी झनक , आमदार , मेडशी विभाग , यांना आमंत्रित करण्याचे ठरले . जि . प. अकोलाचे शिक्षणाधिकारी , पंचायत समिती सभापती , /शिक्षणाधिकारी हयांनाहीआमंत्रित करण्याचे ठरले . त्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका पाठविणेत आल्या .
प्राथमिक विभाग वर्ग १ ते ४ मुले /मुली ,माध्यमिक विभाग वर्ग ५ ते ७
मुले /मुली तसेच मुला- मुलींची एकत्रीत असे गट करून निरनिराळी गाणी , नाट्यछटा ……इ .कार्यक्रमाच्या तालमी जोरात सुरू झाल्या .
मधल्या काळात शेतकरी मेळावाचे आयोजन पंचायत समिति , मालेगांव तर्फे मेडशी येथे करण्यात आले होते .तीन दिवस चाललेल्या ह्या मेळाव्यात शेतकर्यांची राहणे , जेवण ,चहा , नाश्ता …..इ. ची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आलेली होती . जि. प. अकोलाचे पदाधिकारी , कृषि विभागाचे अधिकारी ,तसेच प्रगतिशील शेतकरी ह्यांनी मार्गदर्शन केले . सदर मेळावा-शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,कर्मचारी वर्गाने सहकार्य केले . ह्या शिबीरामुळे मेडशी शाळेच्या शताब्दी सोहळ्याची जणूकाही रंगीत तालीमच झाली .
मेडशी शाळेच्या शताब्दी सोहळ्याला माननीय रामरावजी झनक आमदार , मेडशी विभाग ह्यांच्यासोबत नामदार बाबासाहेब सरनायक मंत्रीमहोदयांनाही बोलविंण्यात आले .त्यामुळे जिल्ह परिषद अध्यक्ष , शिक्षण विभागाचे सभापती ,पंचायत समिती , मालेगांवचे सभापती , पंचायत समितीचे शिक्षणविभागाचे अधिकारी …….इ . ची उपस्थिती अपरिहार्य झाली . ह्यासगळ्या बाबींचा बारकाईने विचार करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी नेमबाजीचे प्रात्यक्षिक दाखवितांना उपस्थितांना स्वागताचा फुलांचा हार , त्याचा वरचा धागा धनुष्य बाणाने तोडताच पाहुण्यांच्या गळ्यात ,टाळ्यांच्या कडकडाडात अलगतपणे घालता येतो , हे दाखविले .प्रत्येकाने आपापल्या भाषणात त्यासाठी स्काऊट -गाईडांचे मनापासून अभिनंदन केले .मुख्य पाहुणे आपल्या भाषणांत म्हणाले , ” मी तर खूपच घाबरलो होतो . हाराचा धागा अचुकपणे भेदला गेला नी फुलाच्या हार माझ्या गळ्या पडला अन माझा जीवही भांड्यात पडला ! ह्यासाठी मी त्या स्काऊट -गाईडांचे तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतेा आणि ह्यासगळ्या चमूला माझ्यातर्फे रू. ५०१ चे पारितोषिक जाहीर करतो.” टाळयांचा प्रचंड कडकडाट झाला ” . त्यानंतर प्रत्येक पाहुण्याने आपापली रोख बक्षीसे जाहीर केली .

त्यानंतर प्राथमिक विभागाने आणि नंतर पूर्व प्राथमिक विभागातील मुला मुलींनी विविध गाणी ,नाट्यछटा , नृत्य ….इ कार्यक्रम सादर केले . श्री .हाते गुरूजींनी शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंतची शाळेची प्रगती कशी कशी होत गेली ह्याची सविस्तर माहिती सांगितली . त्यानंतर त्यांनी पूर्व- माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत अकोला जिल्ह्यातील पहिल्या तीनपैकी दोन विद्यार्थी मेडशी शाळेचेच आहेत तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेतही बरेच विद्यार्थी मेेरीटमध्ये आल्याने शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याचे जाहिर केले .

ह्या सगळ्या कामाच्या गदारोळात मी माझ्या स्वत:च्या प्रगतिबाबतही जागरूक होतो.माझ्या कुटुंबात मी मोठा असल्याने , माझ्या लहान भावंडांची भविष्यात प्रगति उत्कृष्ट पध्दतिने होण्यासाठी , प्रथम त्यांना योग्य व पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे ठरते . ह्या विचारानेच मला माझा मार्ग गवसला .मी प्रथम माझी स्वत:ची प्रगति करणे हा एकमेव मार्ग असल्याची जाणीवही मला होती .मार्ग सोपा नव्हता . नोकरी होती , ह्याआधारावरच , वरिष्ठांची मर्जी सांभाळून (१ ) पदवी संपादन करणे , (२ )पदवी धारक झाल्यावर , उघडलेल्या विस्तिर्ण अशा क्षितिजात , महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा देता येतील . (३ )आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने लहान बहिण- भावंडांचे शिक्षण , नोकरीसाठी जोरकस प्रयत्न करता येतील , असे मनाशी पक्के ठरविले .

मी B.A . part 1 च्या नागपूर विद्यापीठाच्या बहि:शाल परिक्षेचा फॉर्म भरायचे ठरविले . त्यावेळी बँक ऑफ बडोदा , कापड बाजार , शाखेत , परिक्षेचा अर्ज ,परिक्षा फी भरल्याची चलान , त्यामागे सोबत जोडलेल्या मूळ प्रमाणपत्रांची यादी (हाय्यर सेकंडरी स्कुल सर्टिफुिकेट परिक्षेचे प्रमाणपचर तसेच गुणपत्रिकेची प्रत ) लेखी नमूद करावयाची होती , चलनाची चौथी प्रत बँकेने मला दिली .
साधारणपणे २० दिवसांनी मली विद्यापिठाकडून पत्र मिळाले . त्यांत माझे एच . एस . एस . सी ची मार्क प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे नमूद केल् होते . आता माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला की H. S . S . C . चे दुसरे मुळ (original ) प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तांतडीने मिळणार कोठून ? त्याला पर्याय काय ? Duplicate Certificate /Mark list मिळवायला किमान ३ ते ४ महिने लागतील . कालावधी तर मर्यादित दिला आहे . नाहीतर परीक्षेला बसता येणे अशक्य कोटितील बाब ठरणार .सगळी स्वप्ने भंगणार . No Progress , Never think of the dreams . हा विचार करतांना मला माझ्या शाळेची आठवण झाली .

माझ्या Govt . Multipurpose Higher Secondary School , Near Akola Railway Station ,ला भेट देऊन कोणाची भेट होते काय? पहावे प्रयत्न करून अशा विचाराने शाळेच्या कार्यालयात प्रवेश केला . तेथे ओळखीचा चेहरा शोधू लागलो . तोच कानावर शब्द आले , काय विनोदराव ? कसले काम आहे ? आवाजाच्या दिशेने निरखून पाहिले ,तर श्री . गजरेमामा (श्री .हिंगणेकर मामांचे मित्र ) मला बोलावत होते .त्यांना सर्व वर्तमान सांगितले . त्यांनी मला ताबडतोब रूपये पांच ची चलान ट्रेझरीत भरायला सांगितले . शाळेतून जन्म- तारखेचा दाखला तांतडीने मिळावा यासाठी मुख्याध्यापकांच्या नांवे अर्ज करावयास सांगितले . अवघ्या दोन तासात ”श्री . विनोद वामनराव लोणकर ह्यांची जन्म तारीख शाळेच्या रजिस्टरमध्ये नोंदल्याप्रमाणे दिनांक १ जून १९४५ अशी आहे . त्यांनी नागपूर माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक परिक्षा मार्च १९६१ साली पास झाल्याने शाळा सेाडली .” असा दाखला दिला . श्री .गजरे मामांनी माझी आपुलकीने माहिती विचारली . त्यांच्या रूपात मला प्रथमच देव भेटल्याचा आनंद झाला . नागपूर विद्यापीठाला शाळेतून मिळालेला दाखला , बँक मँनेजरचा दाखला , चलानची चवथी प्रत ……इ . रजिस्टर पोस्टाने पाठविली . परिक्षेचे तात्पुरते प्रवेश पत्र श्री . शिवाजी हायस्कुलच्या परिक्षा केंद्रावरून मिळवून परिक्षा दिली .

पण माझा परिक्षेचा निकाल नागपूर विद्याुपीठाने जााहीर केला नाही ,राखून (Withheld )ठेवण्यात आला . मी शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या गडबडीतही न विसरता पुन: पुरवणी (Supplementary ) परिक्षेला बसलो , पात्र परिक्षेच्या ( Qualifying ) ठिकाणी मात्र मार्च १९६८ च्या परिक्षेची माहिती लिहीली त्यांत RESULT NOT KNOWN असा उल्लेख केला . पुढे १९६९च्या उन्हाळ्यात माझे अकोल्याचे शेजारी व मित्र श्री . अवस्थी Blood Technition च्या प्रशिक्षणासाठी नागपूरला गेले होते . तेथे नागपूर विद्यापीठाच्या रजिष्ट्रारचा मुलगाही प्रशिक्षणासाठी सोबतच होता .त्या मित्राचे घरी एकदा माझाही विषय निघाला. तेथे त्याचे वडीलही हजर होतेे . त्यांच्याकडे माझ्या मित्राने फक्त माझाच B. A .Part 1 निकाल एक वर्षापासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले .त्यानंतरच्याच आठवड्यात माझा निकाल जाहीर होऊन मला बी .ए. भाग १ ,मार्च १९६८ च्याच परिक्षेत ”उत्तीर्ण ”घोषित करणेत आले .

१९६९ हे वर्ष माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचे ठरले .माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी / वळण मिळाले .मी बी . ए .भाग १ ची परिक्षा पास झाल्याचे जवळ जवळ एक वर्षानंतर कळले . मला व घरच्या सगळ्यांनाचखूप आनंद झाला.माझा पुढील प्रगतीचा आणि लख्ख प्रकाशाचा मार्ग खुला झाला. माझ्या प्रयत्नांना आशेची पालवी फुटली . त्याच कालावधीत ति .रा. रा. हिंगणेकरमामा
मेडशीला आले . त्यांनी ति. बाबांना व मला जानेफळ जि . बुलढाणा येथे श्री .किसनराव पिंजरकरांची S.S. C. ला शिकत असलेली , मुलगी कु . निर्मलाला पाहण्यास नेले . अगोदरच ठरल्याप्रमाणे बुलढाण्याचे श्री . राजाभाऊ खिरोळकरमामा आलेले होते . मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला . जेवण झाल्यावर आम्ही तिघेही मेहेकर -मालेगांव मार्गे मेेडशीला परत आलो.त्यादिवशी रात्री मी अर्धवट झोपेतअसतांना ती .बाबा , सौ. आईला ति .रा . रा. हिंगणेकरमामांनी विनोदसाठी पाहिलेली मुलगी चि. कु. निर्मलाच्या Face-Reading प्रमाणे मुलीच्या घरची आर्थीक परिस्थिती बेताचीच असली तरीही ही मुलगी ज्या घरी जाईल त्या घरची लक्ष्मी बनेल . मला चि. विनोदसाठी ही मुलगी पसंत आहे . तुमच्या घरात ही मुलगी आल्यावर तुमच्या प्रगतीचा आलेख वरवरच चढत जाणार आहे . असे त्या मुलीच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसते .आणखी महत्वाची बाब म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या भागात दुसरी कोणतीही ह्यासारखी मुलगी दिसत नाही . त्या रात्री मी अर्धवट झोपेत एवढेच ऐकले होते .. सकाळी ऊठल्यावर चहा पिता पिता मला ती .आई बाबांनी तसेच ति. हिंगणेकरमामांनी पसंती विचारली . मी लगेच होकार दिला . चि. कु.निर्मलाचे वडील निवृत्त शिक्षक होते .ते अप्रशिक्षित असल्याने त्यांना निवृत्त्तीनंतर मिळालेली रक्कम फार तुटपुंजी होती . माझ्या लग्नाचा २६ मे १९६९ हा गेारज मुहूर्त ठरविण्यात आला . लग्न निर्मलाच्या मामाच्या गांवाला नांदुरा (मध्य रेल्वे) जवळच्या दहिगां (माटोडा ) येथे ठरविण्यात आले . ति. हिंगणेकरमामांनी मी फक्त ‘ मुलाचा मामा ‘ म्हणून विनोदच्या मागे उभा राहील असे स्पष्टपणे सांगितले . त्याप्रमाणे मुलीकडे
मुलीच्या मामाकडे ” वधुपसंती ” कळविणेत आली . ति . हिंगणेकरमामांच्या भविष्याची मला लगेच प्रचिती आली . मी लग्नाला फक्त होकारच दिला नी दुसरेच दिवशी माझा B. A . part l चा एक वर्षापासून प्रलंबित निकाल पोस्टाने मिळाला . मी मार्च १९६८ च्याच परिक्षेत ऊत्तीर्ण झालो होतो . सगळ्यानी माझे अभिनंदन केले . अत्यानंदाने लग्नाची तयारी सुरू केली . भोनला ति.रामचंद्रकाका व ति. सदाशिवकाका तसेच ईतर नातेवाईकांनाही लग्न-पत्रिका पाठविणेत आल्या.लग्नाचा कार्यक्रम दहिगांव (माटोडा ) येथे रामाच्या मंदिरात आनंदाने पार पडला .
मेडशी येथे परत आल्यावर सत्यनारायणाची पूजा झाली .त्यानंतर पंगत देण्यात आली . पंगतीत पुरी ,वांगे-बटाटा भाजी , भजी ,व बुंदीलाडू केले होते . पंगतीत श्री .जगन्नाथदादा सर्वाधिकारी होते . ही पंगत दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहीली .श्री . गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जातांना , तसेच श्री .गाडगेबाबा व वारकरी मेडशीला थांबत . ह्या सर्व वारकरी मंडळींच्या जेवणाच्या पंगतीचे सर्वाधिकारी श्री . जगन्नाथ दादाच असत .

पुढील वर्ष बी .ए . भाग २ ला नागपूर विद्यापीठाने परिक्षा न घेण्याचे जाहीर केले होते . शाळेच्या शताब्दी महोत्सवामुळे मी पुस्तकांना स्पर्शही करू शकलो नव्हतो . पुढील वर्ष १९७० हे बी.ए. फायनलचे वर्ष होते . मी पातूर , अकोला ,तसेच वाशीम येथील कॉलेजमधून , प्राध्यापकांकडून पुस्तके आणली . रविवार ,शुक्रवार,

तसेच ,सुटीच्या दिवशी वेळ मिळेल तेव्हा पुस्तकातून लेखी टिप्पण्या काढण्याचे काम वर्षभर केले. कारण मार्च महिन्यात सगळ्या कॉलेजमध्ये घेतलेली पुस्तके परत करावी लागणार होती . अर्थशास्त्रासह सगळ्या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मिळवून मी घड्याळ लाऊन तीन तासात प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला . अकोल्याला सीताबाई आर्टस कॉलेजातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना भेटून सोडविलेली प्रश्नपत्रिका दाखविली . त्यांनी ती तपासली व एवढे लिहिले तरी तुुम्ही पास होणारच हे नक्की . माझा शाळेचा कामाचा व्याप सांभाळून मला B. A. Final ची तयारी करायची होती . दररोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी घरी जाऊन कपभर चहा घ्यायचो .त्यानंतर गांवाबाहेर वाशीम रोडवर मोर्णा नदीच्या पुलापलीकडे जाऊन शेतात झाडाखाली बसून वाचन करायचो . संध्याकाळी शिक्षकवर्ग , मोर्णा नदीच्या पुलाच्या बाजूच्या टेकडीवर रेस्ट हाऊस कडे फिरायला येत . माझे तासभर वाचन झाल्यावर मी ह्या शिक्षकांसोबतच घरी परत यायचो .परिक्षा झाली , परिक्षेचा निकाल जाहीर झाला .
मनात धाकधूक होती . कारण अर्थशास्त्राचे पेपर श्री . मुताटकर नामे प्राध्यापकांकडे तपासणीसाठी होते . कॉलेजमधील प्रथम श्रेणीत पास होण्याची खात्री असलेले विद्यार्थीसुध्दा त्यात नापास झाल्याचे समजले . मला एकूण २११ मार्क मिळाले होते . मेडशीला श्री . जोशी मेडीकल ऑफीसरांचे लहान भाऊ
श्री . सत्यनारायण जोशी , अमरावतीला श्री .शिवाजी महाविद्यालयात ईंग्रजीचे प्राध्यापक हेोते . ते अत्यंत हजरजबाबी होते . त्यांनी पोष्टातच माझी बी
. ए . फायनलची गुणपत्रिका पाहिली नी उद्गागारले “You are winner Sir , you deserve for this great achievement . You are the first Person who got 1 st External Degree of the Nagpur University . ” नंतर हळूच म्हणाले But you have obtained only 211 (अडीच) Marks only . मला काहीच कळले नाही . नंतर सगळे लक्षात आले .

आता माझेसाठी पदवीधारकांसाठींचे स्पर्धेचे क्षेत्र खुले झाले होते . M.P S.C./U.P. S . C . केंद्रीय लोकसेवा आयोग , राज्य लोकसेवा आयोग …..इ . परिक्षादेता येतील .ध्येयपुर्तिसाठीचे पुढचे आणखी एक पाऊल पुढे वाटचाल सुरू झाली .त्यावेळी १९७० -७१ साली राज्यलोकसेवा आणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची माहिती सहजपणे ऊपलब्ध नव्हती.स्थानिक ‘ मातृभुमी ‘ वर्तमानपत्रात त्याची दोनओळींची जाहिरात शोधायची .पंचायत समिती मालेगांव,कार्यालयात जाऊन संवर्ग विकास अधिकारी , श्री. प्रचंडसाहेबांच्या परवानगीने शासकीय राजपत्रातील,मध्य ऊपविभाग,भाग १ ताब्यात घेणे . त्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकारी वर्ग १ वा २ च्या परिक्षेची माहिती मिळविण्यासाठी मुंबई येथील बँक ऑफ ईंडिया ईमारतीतील आयोगातसेचच्या कार्यालयातून परिक्षेचे अर्ज मागविणे .सदर अर्ज शाळा , पंचायत समिती मालेगांव,जिल्हा परीषद शिक्षणाधिकारी ,जि.प. अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयेागाकडे पाठविणे ह्या प्रक्रियेतून जावे लागायचे .त्यानंतर शासकीय बुक डेपो मुंबई ,औरंगाबाद ,पुणे व नागपूर येथे पत्र पाठवून राजपत्रीत अधिकारी परिक्षेचे पेपर्स मागवावे लागत .Papers are not available अशी ऊत्तरे यायची .मागील परिक्षेचे पेपर्स मिळायचे नाहीत . मग मी Career Competition Review मासीक लावले .General Knowledge चे अद्ययावत प्रत मिळवायची . अभ्यास सुरू केला . परिक्षेचे केंद्र नागपूर निवडले .
नागपूरला मी प्रथमच जाणार होतो . मला नागपूरची काहिही माहिती नव्हती . परिक्षा केंद्र कोठे आहे . ४ ते ५ दिवस राहायचे , जेवणाचे काय करायचे ? कसे करायचे ? अकोला ते नागपूर तसेच नागपूर येथील प्रवासाची सोय करूनच मला जावे लागणार होते . ति. रा. रा . बाबांना श्री . सालफळे काकांचा सध्याचा पत्ता माहिती नव्हता . फक्त वाकर रोड , माताचे देवळाजवळ ,नागपूर . एवढाच जुना पत्ता आजोबांच्या काळातला लक्षात राहीला होता . जवळ फक्त रू. ३० .०० घेऊन नागपूर वारी करायचा होती .त्यावेळी फोनचीही सोय नवहती . पत्रव्यवहार करून भोननहून मोठ्या काकांना नेमका पत्ता विचारायला वेळही नव्हता .अकोला-नागपूर रेल्वे प्रवास वजा करून रू .१० .०० शिलकीतून आठवडा काढायचा होता . अकोला येथून पँसेंजरने मिलीटरी बोगीत बसून निघालो . पँसेंजर रात्री ११ वाजता नागपूरला पोहोचणार होती . बडनेरा जंक्शन येथे अमरावतीहून आजीबा सोबत एक तरूण नातही आमच्या बोगीत चढली . आमची रेल्वेगाडी पुलगांव स्टेशनवररून सुटता सुटता ५-६ कामकरी बायका चढल्या त्याही आमच्याच बोगीत ‘थेाडयाच वेळात त्यांच्या गप्पा सुरू झाल्या .थोड्या वेळाने त्यापैकी एका बाईने माझ्या बाजूलाच बसलेल्या आजीबाईला कोठे जाता ? नागपूरला का ? पण तुम्ही नातीसाठी चांगला नवरा शोधला बरे ! चांगली राधा-कृष्णाची जोडी जमवली आहे . आजीसोबतची ती तरूणी लाजून चूर झाली . नागपूर येता येता आजीबाईनी मला त्यांचे सोबतच त्यांच्या मोठ्या मुलीकडे वाकर रोडच्या बाजूलाच येण्याची गळ घातली . मलाही आयतीच सोबत मिळाली , रिक्षाचा खर्च वाचला . त्यांच्याकडे चहा घेऊन मी रिक्षावाल्याला श्री. सालफळे , वाकर रोड , माताचे देवळाजवळ ह्या पत्यावर चलण्यास सांगीतले . वाकर रोडवर आजूबाजूला मिळून ४ – ५ माताचे देवळे पाहीली पण श्री . सालफळे काकांचे घर सापडले नाही. शेवटी एक तासानंतर तेथे जवळच्या संघ कार्यालयातील काही कार्यकर्ते भेटले . त्यांनी वाकर रोडवरच हिमालय दवाखान्याजवळ माताचे देऊळ आहे . त्याच्या जवळच रेल्वेवाले सालफळे राहतात . मी हिमालय दवाखान्याकडील दरवाजा वाजविला . रात्रीचे दोन वाजत आले होते . दरवाजा म्हातारीने ऊघडला . कोण ? विचारताच मी भोनच्या श्री .वामनराव लोणकरांचा मोठा मुलगा विनोद ! असे ऐकताच म्हातारीला आनंद वाटला . तेव्हड्यात श्री .सालफळे काकांनी विचारले , एव्हड्या रात्री कोण आलं ? म्हातारीने उत्तर दिले ‘भोनच्या वामनचा मोठा पोरगा आहे . मला आता आठवले ही म्हातारी ति . बाबांनी सांगीतलेली ‘मामी ‘असावी . मी आत गेलो , पडवीत थांबलेा , काकांनी पाणी आणून दिले व दरवाजा बंद केला . मी माझे स्काऊटचे बेडींग ऊघडून झोपलो . सकाळी पाच वाजताच श्री. सालफळेकाका व सौ. कमल मावशी ऊठले . भुशाची शेगडी पेटऊन पितळेच्या:-) बटात (मातीच्या मोठ्या गाडग्यासारख्या ) चहा करित होते . मीô सगळ्यांना नमस्कार केला . ति. सालफळे काकांना माझी सगळी माहिती सांगीतली .श्री .सालफळे काका मितभाषी हेाते . त्यांना खूप बरे वाटले , लोणकरापैकी
एक मुलगा पुढे जाण्यासाठी धडपड करतो आहे हे ऐकून ते आनंदी झाले . त्यांनी मला बाजूच्याच दुकानातून ओळख देवून दिवसभरासाठी देान रूपये दराने सायकल भाड्याने मिळवून दिली . परिक्षा केन्द्राचा रस्ता समजावून सांगीतला . सौ. कमल मावशीने नाश्ता बनविला ते पोटभखाऊन मी परीक्षा केन्द्रावर गेलो .पेपर कठीण वाटले नाहित . तिसरे दिवशी सालफळेकाकांचा , सौ . कमलमावशी (कमरेत खूप वाकलेली ), त्यांचा मुलगा प्रमोद व त्याच्या बहिणीचा निरोप घेऊन मेडशीला परतलो .
मधल्या काळात मी सिनिअर पी . टी .सी . परिक्षा पास झालो . D. Ed .Part 1 ची परिक्षा द्यायची असे ठरविले .अकोल्याला नॉर्मल स्कुलमध्ये बहि:शाल व दर रविवारी ट्रेनिंगला सुरवात झाली . महाराष्ट्र शासनाने D. Ed .Part 2 चीही परिक्षा एकाच वर्षी देता येईल असे दिवाळीचे वेळी कळविले . मी लगेच ह्या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. मला अकोल्याच्या विद्यामंदीर मुलींच्या पत्रव्यवहाराने शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती मिश्रा ह्यांची साथ मिळाली . मला मुलींच्या नॉर्मल स्कुलमध्ये D.Ed ,. Part साठी प्रवेश मिळाला होता . परिक्षा झाली ,
निकालाच्या दिवशी D. Ed ,part 2 चा परिक्षेचा निकाल प्रथम लागला . मी त्यावेळच्या प्राचार्या श्रीमती डिडोळकर भेटल्या त्यांना अत्यानंद झाला . D. Ed . part 1 चाही निकाल आठवडाभरात लागला .मी ऊत्तीर्ण झालो होतो . मी ह्या काळात M. A. Part 1 व 2 (राज्यशास्त्र)ही ऊत्तीर्ण झालो होतो . माPझे नांव़आता पदवीधर प्राथमिक शिक्षकाच्या वेगळ्या यादीत स्थान मिळाले होते . मी इतरही X- Ray Technition , T . B . Technition …..ई. ची मुखलाखातही दिली .
M.P.S.C.ची परिक्षा देणे सुरू होते .U. P.S.C. केन्द्रिय लोकसेवा आयोगाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा सवलतीत न बसल्याने मी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेकडेच माझे पूर्ण लक्ष केंद्रित केले . १९७१ च्या राजपत्रित अधिकारी वर्ग १ च्या परिक्षेसाठी अर्ज करतांना आर्थिक द्दष्ट्या मागालसलेल्या वर्गासाठी आरक्षण ठेवलेले होते .त्यासाठी वैयक्तिक मासीक उत्पन्न, सर्व मार्गांमिळून रू . २००.०० च्या वर नसावे तसेच सदर प्रमाणपत्र तहसिलदाराच्या वरच्या महसूल अधिकार्याने दिलेले असावे ही अट होती . मुलाखतीच्या अगोदर मी सदर प्रमाणपत्र वाशीम येथील S.D. O. श्री . शहापूरकर (I .A.S. ) समोर कोर्टात प्रत्यक्ष हजर राहून मिळविले होते . हे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडू शकलो नव्हतो .
नागपूरला प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी मी ते घेऊन गेलो होतो .मुलाखतीच्या दिवशी रवी भवनला मी एकटाच आवारात फिरत होतो .तेव्हड्यात एका ईमारतीच्या तिसर्या मजल्यावरून आवाज आला , A mister will you please come up . मी त्याप्रमाणे त्यांच्या खोलीत गेलो . त्यांची रूम एका बाजूला होती .त्यामुळे तसेच कामाच्या घाईत विश्रामगृहाचा खानसामाने ९ वाजत आले तरी त्यांच्या खोलीत चहा , नाश्ता आणून दिला नव्हता . त्यांच्या खोलीतील फोनही बंद होता . त्यांनी त्यांची ओळख करून दिली . ” I am Wankhede , Chairman , M. P. S .C . , Will you please arrange Tea and Breakfast for me . ” माझ्या लक्षात आले की ,खानसामा चहा – नाश्ता द्यायला विसरला असावा . मी तांतडीने खानसामाकडे गेलो . त्याला विचारले की तुम्ही अजूनपर्यंत एम .पी.एस.सी. चेअरमन , श्री. वानखेडेसाहेबांना चहा – नाश्ता कां नेऊन दिला नाही ? त्याने मला माफी मागीतली व लगेच माझेसोबतच चही- नाश्ता घेऊन निघाला .श्री .वानखडे साहेबांच्या खोलीत पोहोचलो. श्री. वानखेडेसाहेबांनी Thanks म्हणून मला Please join me म्हणाले .मी त्यांचे आभार मानले . थोड्या वेळाने त्यांचेसोबतच मुलाखतीच़्या जागी आलो . ते तेथून दुसर्या मजल्यावर गेले .
मी माझी सगळ्या मूळ प्रमाणपत्राची फाईल तयार करून
तेथील मुलाखतीच्या अगोदर प्रमाणपत्र तपासणी करीत असलेल्या अधिकार्याला दाखविली . माझे आर्थिकद्दश्टया कमकुवतचे प्रमाणपत्र पाहताच , ते अतिशय रागावले .
तपासणी अधिकारी- मी सदर प्रमाणपत्र तपासणार नाही .You can’t claim now. Who is this ‘Bloody ‘officer to issue this Certificate?
मला ह्या गोष्टीचा राग आला होता ,पण त्यावेळी रागात काहिही बोलणे योग्य नव्हते .
मी बोललो -If you have Guts ,Have a lighting call and ask him ”you Bloody, How You Have issued this Certificate” . That S.D. O . is I .A. S. ,He will give you proper answer .
तपासणी अधिकारी -I will not verify anybody’s certificates .
मी बोललो That is your duty , and you are answerable to your Authorituy .You may or you may not ,your choice!
त्या दिवशी फक्त १६ ऊमेदवारांचीच M.P .S.C . मुलाखत होणार होती . माझा नंबर तिसरा होता . माझ्या अगोदरच्या ऊमेदवाराची मुलाखत सुरू होती . माझ्या बोलण्याचा तपासणी अधिकार्याला खूप राग आला. . त्यांनी प्रमाणपत्र तपासणी थांबविली आणि पहिल्या मजल्यावरील मुलाखतीच्या खोलीकडे गेले .
क्रमांक दोनवरील ऊमेदवाराची मुलाखत झाल्यावर तो बाहेर येताच, तपासणी अधिकारी आत गेले . मी मनाशी खुणगांठ मारली नी समजलो की आता आजच्या मुलाखतीत मी यशस्वी होणे अशक्य आहे.
तपासणी अधिकारी बाहेर आल्यावर पांच मिनिटानंतर मी स्वत:ला सावरले नी आंत शिरलो .
मुलाखत घेणारे दोनच अधिकारी व्यक्ति होत्या . त्यांनी त्यांची ओळख करून दिली , चेअरमन श्री . एम. एन . वानखडे आणि सदस्य श्री. रिझवी . त्यांनी मला जागेवर बसायला सांगीतले नी मुलाखतीला सुरवात झाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)